Showing posts with label Pune. Show all posts
Showing posts with label Pune. Show all posts

Thursday, September 25, 2008

वरवरची मलमपट्टी नको, शाश्‍वत विकास हवा...?

राष्ट्रकुल स्पर्धा अगदी तोंडावर आल्या आहेत. या स्पर्धेसाठी देशोदेशीतून येणाऱ्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज होत आहे. वातावरण निर्मितीला चांगलाच जोर चढलाय. भित्तिचित्रे रंगविण्याबरोबरच, सुशोभीकरण, डांबरीकरण आणि इतर विकासकामांना वेग आला आहे. किंबहुना शहरातील कोणत्याही भागात गेल्यास विविध कामं सुरू असल्याचे चित्र दिसते.

आतापर्यंत खड्ड्यात शोधावा लागणारा रस्ता खड्डेविरहित झाला आहे. तर त्या रस्त्यांवर दुभाजकांचा पत्ता नव्हता तेथे दुभाजक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचे चित्र रंगविण्यासाठी शहरातली एकही भिंत सोडलेली नाही. विकास आणि निसर्ग शहरात हातात हात घालून चालतात, असा भास निर्माण करण्यासाठी दुभाजकांवर शोभिवंत झाडे लावली जात आहेत. स्वच्छ आणि सुंदर पुणे या संज्ञेखाली रस्त्यांची सफाईही रोजची बाब झाली आहे. ठिकठिकाणी होर्डिंग उभारले जात आहे. "पीएमपीएलएम'ने ही कंबर कसली असून, सीवायजी या नवीन बस आपल्या ताफ्यात रुजू केल्या आहेत.

अशाप्रकारे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सर्व यंत्रणा अंग झटकून कामाला लागल्या आहेत. शहराचे चित्र पालटताना पाहून मनोमनी आनंद दाटून येतो. चला...राष्ट्रकुलच्या निमित्ताने का होईना, शहराचा विकास होतो आहे, हे काय कमी आहे? असेही वाटून जाते. पण, जरा निरीक्षण केल्यावर असे लक्षात येतेय, की ही काम उरका पाडल्याप्रमाण सुरू आहे. केवळ राष्ट्रकुल पुरता असेच सर्व कामांचे स्वरूप दिसतेय. रस्त्यावर केवळ डांबराचा थर चढवला जातोय. तर, रेडिमेड प्रकारातली झाडं आणून लावली जाताहेत. हे सगळं पाहिल्यावर असं वाटतं, केवळ राष्ट्रकुल पार पडेपर्यंतच शहरविकासाची मलमपट्टी केली जातेय. त्यामध्ये शाश्‍वत विचार अजिबात झालेला नाहीये.

पण, अशाप्रकारची वरवरची मलमपट्टी काय कामाची. शहराचा विकास दूरदृष्टी ठेवून झाला पाहिजे. 2010 साली तर पुन्हा राष्ट्रकुल होणार असेल, तर हा विकास त्या स्पर्धेपर्यंत टिकायला हवा. नाही का?

Monday, September 22, 2008

मित्राने २३ लाख बुडविल्याने कुटुंबाचा अंत

पत्नी आणि दोन मुलांचा दोरीने गळा आवळून खून करून पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरीच्या मिलिंदनगरजवळ रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास उघडकीस आली. पतीने पत्नी आणि मुलांना पावभाजीतून विष दिल्याचेही आढळले.

उसनी दिलेली मोठी रक्कम वसूल न झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. विजय मुथय्या पुजारी (वय ४५), पत्नी सुगंधा (वय ४०), मुलगा प्रतीक (१२) आणि मुलगी प्रेरणा (१८, रा. सर्व मिलिंदनगरजवळ, व्हिक्‍टरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, पिंपरी) अशी मृतांची नावे आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी कुटुंबीय मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३० वर्षांपासून शहरात स्थायिक झाले होते. त्यांचा मुलगा प्रतीक पाचवीत शिकत होता; तर प्रेरणा एम. यू. महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती.

सहायक पोलिस आयुक्त प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांचा मृतदेह छताच्या हुकाला लटकलेला होता. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांच्या गळ्यांवर दोरीने आवळल्याच्या खुणा आढळल्या. विजय यांच्याजवळ एक चिठी सापडली आहे. ""एका मित्राला २३ लाख रुपये दिले होते. ते परत करण्यासाठी मित्राने दिलेले दोन धनादेश न वटल्याने मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही,'' असा मजकूर या चिठीत आहे.

अशाप्रकारे घरातील इतर सदस्यांचा खून करून आत्महत्या करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. आर्थिक तोटा सहन करावा लागला महणून आत्महत्या करणे, हा मार्ग होऊ शकत नाही. शिवाय आर्थिक फरवणुकीच्या घटनाही अलीकडे वाढलेल्या दिसतात. बेभरवशाच्या आजच्या जमान्यात कोणाशीही एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार करणे सर्वसामान्यांनी टाळायला हवे. नाही का...?आपल्याला काय वाटते, याविषयी? आपणही अशा घटना आजूबाजूला पाहिल्याच असतील. तर, आमच्याशी त्या शेअर करा, पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर

Saturday, September 06, 2008

सिम्बायोसिस टेकडीवर हिरवाई

शहरातील प्रदूषण, वृक्षतोड, नष्ट होत असलेल्या टेकड्यांबद्दल नेहमीच चर्चा होते. महापालिका, वनखात्याचे अधिकारी विविध उपक्रम राबवितात; पण जबाबदार नागरिक म्हणून या समस्येवर मार्ग काढणारे फार थोडेच! याच हेतूने काही मंडळी सिम्बायोसिस टेकडीवर एकत्र आली आणि बघता बघता गेल्या दहा वर्षांत त्यांनी टेकडीचे चित्रच पालटून टाकले... या मंडळींनी स्थापन केलेल्या "ग्रीन हिल्स ग्रुप'ने विविध प्रकारच्या झाडे लावण्याबरोबरच महापालिका, वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाण्याचे नियोजनही केले आहे. गवतही उगवणार नाही, अशा खडकाळ टेकडीवर ग्रुपने हिरवीगार वनराई फुलवली आहे. डेक्कन आणि सेनापती बापट रस्त्यावर फिरताना बाहेरून कोणाला वाटणारही नाही एवढी हिरवाई टेकडीवर पाहायला मिळते. विविध प्रकारचे पक्षीही येथे वास्तव्यास आले आहेत.

"ग्रीन हिल्स ग्रुप'च्या या कार्याला या वर्षी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यात प्रामुख्याने शिंदेमामा, श्रीकांत परांजपे, रवी पुरंदरे यांच्यासह निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही मंडळी रोज सकाळी व्यायामासाठी, श्रमदानासाठी जमतात आणि रोपांना माती लावणे, पाणी साठवण्याच्या खड्ड्यातील माती काढणे, नवीन रोपांची लागवड आणि रोपांची मशागत करताना दिसतात. काही शाळा आता त्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत.

याबद्दल माहिती देताना पुरंदरे म्हणाले, ""झाडे लावल्यानंतर त्यांना पाणी घालायचे कसे, असा प्रश्‍न पूर्वी आमच्या समोर होता. यासाठी टेकडीवर व्यायामाला फिरायला येणाऱ्या लोकांच्या हातात पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या द्यायला सुरवात केली. ज्यांना शक्‍य आहे ती मंडळी छोट्या बादलीतून पाणी घेऊन जात होती. आता टेकडीवर सिमेंटच्या टाक्‍या बांधल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्याची काही प्रमाणात सोय झाली आहे. पुढील सहा महिन्यांत महापालिकेतर्फे टेकडीच्या पायथ्याच्या टाकीजवळ सायकली ठेवण्यात येणार आहेत. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी सायकलवर व्यायाम केला की ते पाणी वरच्या टाक्‍यांवर पोहोचणार आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

सिम्बायोसिस टेकडीवर नागरिकांनी निर्माण केलेली वनराई, स्तुत्यच आहे. संपूर्ण शहराचे कॉंक्रिटीकरण होत असताना अशा प्रकारची हिरवी बेटं शहराच्या फुफ्फुसाची भूमिका बजावतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी अशाप्रकारच्या उपक्रमात सहभागी होऊन वनराई तयार केली पाहिजे. तरंच ग्लोबल वॉर्मिंगला काही अंशी का होईना आपण दूर ठेवू शकू...

Tuesday, August 26, 2008

पुण्यात रिंग रोड, "मेट्रो'ला मान्यता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीबाहेरून जाणारा १६० किलोमीटर लांबीचा "रिंग रोड' खासगीकरणाच्या माध्यमातून उभा करण्याचा आणि मेट्रो रेल्वेचा प्रकल्प राबविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला यासाठी सुमारे दोन हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पायाभूत समितीपुढे येत्या पंधरा दिवसांत त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यास विभागीय आयुक्तांना सांगण्यात आले. मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरणही बैठकीत करण्यात आले.

मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारेल का? तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला कळवा.

Sunday, August 24, 2008

शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांसह बैठक

पुणे शहराच्या प्रलंबित प्रश्‍नांची राज्य सरकारकडे तड लागावी, यासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घातले असून, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत ते या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहेत. या बैठकीला राज्य सरकारच्या मुख्य सचिवांपासून सर्व महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

श्री. पवार यांनी गेल्याच आठवड्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांशी चर्चा केली होती. त्यामध्ये अनेकांनी पुण्याचे विविध प्रश्‍न राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याची तक्रार केली.

राज्य शासनाने प्रलंबित असलेले प्रश्‍न खालीलप्रमाणे


* झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाबाबतचे प्रश्‍न मार्गी लागत नाही.
* पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकास आराखड्याला मान्यता.
* आत्तापर्यंत फक्त बाणेर, बालेवाडी या दोनच गावांच्या विकास आराखड्याला अंतिम मान्यता मिळून त्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बाकीच्या नऊ नियोजन गटांच्या विकास आराखड्याला अजूनही मान्यता मिळालेली नाही.
* पुणे शहराबाहेरून आखण्यात आलेले रिंग रोड, पुणे महानगर विकास प्राधिकरण व मोशी येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र.

आपल्याला काय वाटते, की हे प्रश्‍न पुणे शहरासाठी खरोखरीच महत्त्वाचे आहेत का? आणि असतील, तर यापैकी कोणत्या प्रश्‍नांना आपण प्राधान्य क्रम द्याल? या प्रश्‍नांची क्रमवारी कशाप्रकारे लावाल? याव्यतिरिक्तचे प्रश्‍न सोडविले पाहिजे असे आपल्याला वाटत असेल, तर त्यांबाबतही मत मांडा..

Tuesday, August 12, 2008

वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनता

पुण्यातील एकूण लोकसंख्येच्या २५ टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक म्हणजेच पाच लाख एवढी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आहे. मल्टिमीडिया सेक्‍शनमध्ये आणखी भरपूर काही...असे असतानाही शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता दिसून येते. रस्त्यांलगत, चौकांलगत नव्हे तर शहरी मध्यवस्त्यांत असलेल्या शाळांच्या परिसरात या प्रश्‍नाचे गांभीर्य अधिक ठळकपणे जाणवते.

आज पुण्यात शाळांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यातील बहुतांश शाळा मुख्य रस्त्यांलगत आहेत. किंबहुना कित्येक रस्त्यांचा विकास शाळांना डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आला आहे. तर, बऱ्याच शाळा ऐन चौकात आहेत.वाहतूक कोंडी पुणे शहराला नवीन नसली, तरी अनेक रस्त्यांवरील वाहतूक कोंडीला शाळाच कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे; तर याच वाहतुकीने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्‍यात आणली आहे. औंधचे शिवाजी विद्यालय, पुणे विद्यापीठ चौकातील पाषाण रस्त्यालगतचे आणि जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हेलेनाज स्कूल, लक्ष्मी रस्त्यालगतची हुजूरपागा, नूमवि, टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र मंडळ, वनिता समाज शाळांमधील विद्यार्थी वेगवान वाहतुकीचा सामना करत आहेत. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार थेट रस्त्यावरच खुले होत असल्याने विद्यार्थ्यांना अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही.

पाषाण रस्त्यावरील मॉडर्न हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. बनसोडे म्हणाले, ""या रस्त्यालगत असलेल्या विद्यापीठ चौकात तीन रस्ते एकत्रित येतात, पर्यायाने मोठी वाहतूक असते. शाळा तसेच कार्यालये एकाच वेळी सुटत असल्याने शाळेसमोरील रस्त्यावर वाहनांचा ओघ मोठा असतो. शाळेसमोरील रस्त्यांची विकासकामे या प्रश्‍नात भरच टाकतात.'' शाळेच्या आवारात प्रवेश मिळत नाही म्हणून मिळेल तेथे (विद्यार्थ्यांची ने-आण करणारी), कधी रस्त्याच्या पलीकडे, तर कधी शाळेपासून दूर अंतरावर उभी केलेली वाहने, ही वाहने गाठण्याच्या नादात विद्यार्थ्यांनी उडणारी धांदल, तारेवरची कसरत करत वाहतुकीतून वाट शोधणारे विद्यार्थी असे चित्र शाळांच्या ठिकाणी हमखास पाहायला मिळते. अहिल्यादेवी प्रशालेच्या पीएमपीएलच्या बस जागेअभावी बालगंधर्व पुलाजवळ तर रेणुका स्वरूप शाळेच्या बस भिकारदास मारुती मंदिराजवळील बस स्थानकाजवळ थांबवाव्या लागतात, असे बसचालकांनी सांगितले.

मध्यवस्तीतील शाळा जागेचे निमित्त करून वाहनांना प्रवेश नाकारतात. मात्र या शाळांकडून उपलब्ध जागेचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर होत असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. ही वाहने शाळा भरणे-सुटण्याआधीच शाळेबाहेरील अरुंद रस्त्यांवर गर्दी करतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शाळांलगतच्या अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी असतात असे त्यामुळे या रस्त्यांवर रिक्षा उभ्या करता येत नाहीत. अनेक पालक शाळेच्या मुख्य दरवाज्यापर्यंत पाल्यांना सोडण्याबाबत आग्रही असतात त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होते, असे रेणुका स्वरूपच्या मुख्याध्यापिका सुषमा कुलकर्णी यांनी सांगितले.

त्यातच शाळा सुटल्यानंतर तीन हजार विद्यार्थ्यांनींचा लोंढा एकदम रस्त्यावर येतो. परिणामी वाहन चालविणे कठीण जातेच, पण वाहतूक कोंडीला दररोजच सामोरे जावे लागते. काही शाळांच्या चौकात वाहतूक नियंत्रक दिवे लावले आहेत. मात्र, या सिग्नलचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते, असे शाळा आणि विद्यार्थी सांगतात. अगदी याउलट तक्रार अन्य वाहनचालक करतात. या वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावरी अत्यंत बेशिस्तपणे उभी केली जातात. नादुरुस्त वाहतूक नियंत्रक दिवे, गैरहजर वाहतूक पोलिस, शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील झेब्रा क्रॉसिंगचा अभाव यामुळे हा प्रश्‍न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत आहे. काही शाळा वाहतूक कोंडी सोडवण्यास हातभार लावतात. मात्र, काही शाळा ही जबाबदारी ढकलू पाहतात.

वाहतूक विभागाच्या पातळीवरील अनास्था, शालेय पातळीवरील बेजबाबदारपणा, ने-आण करणाऱ्या वाहनचालकांच्या पातळीवरील अरेरावी आणि पालकांच्या पातळीवरील असहाय्यता या गोष्टी विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि हित जोपासण्यास असमर्थ ठरत आहे.

शाळा आणि शाळांलगतची वाहतूक याबाबत आपल्याला काय वाटते. शालेय विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत आणि नित्याने होणारी वाहतूक कोंडी याला कोणते घटक कारणीभूत आहेत, असे आपल्याला वाटते. शिवाय या गोष्टी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजे, असे आपल्याला वाटते?
आपण आपल्या प्रतिक्रिया एसएमएसद्वारेही पाठवू शकता. त्यासाठी टाईप करा. एअरटेल मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 56666 वर. इतर मोबाईलधारकांसाठी PUN5 (आपली प्रतिक्रिया) आणि पाठवा 54321 या क्रमांकावर.

Tuesday, August 05, 2008

पोलिस करणार पाच मिनिटांत शहराची नाकाबंदी

कोणतीही अनुचित घटना घडली तर शहरातून जाणाऱ्या व येणाऱ्या बारा रस्त्यांवर अवघ्या पाच मिनिटांत नाकाबंदी करण्याची योजना शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तयार केली आहे.या प्रलंबित योजनेला पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांनी मान्यता दिल्याने तिच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शहरात खून, दरोडे, जबरी चोरी, गोळीबार अशा प्रकारचे गुन्हे शहरात वरचेवर घडतात. अशा वेळी नियंत्रण कक्षातून सर्व पोलिस ठाण्यांना बिनतारी यंत्रणेवर नाकाबंदीचा आदेश दिला जातो. त्यानंतर कर्मचाऱ्यांची जमवाजमव करून पोलिस रस्त्यावर उतरतात. त्यामुळे नाकाबंदी होण्यासाठी बराच काळ जातो. तोपर्यंत चोरटे पलायन करतात, असा पोलिसांचा अनुभव आहे. हा विलंब टाळण्यासाठी व नाकाबंदी तत्परतेने व्हावी, यासाठी गुन्हे शाखेच्या तत्कालीन उपायुक्तांनी शहरातून बाहेर पडता येतील अशा बारा रस्त्यांची माहिती संकलित केली होती.

या रस्त्यांवर पोलिस चौकीच्या धर्तीवर तपासणी नाका उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यात एक अधिकारी, एक वाहतूक पोलिस कर्मचारी, दोन हत्यारी पोलिस व दोन कर्मचारी असे एकूण सहा जण असतील. अशा प्रकारची केंद्रे बारा ठिकाणी तयार केल्यास अवघ्या पाच मिनिटांत शहराची नाकाबंदी करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे शहरातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणाही निर्माण करण्याचा त्यामागे उद्देश आहे. या केंद्रांसाठी जागांचीही पाहणी झाली होती. मात्र, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेशी बोलणी अद्याप झालेली नाहीत. गुन्हे शाखेने तयार केलेल्या या प्रस्तावाला तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती; परंतु त्यावर पुढे कार्यवाही झाली नाही. या योजनेच्या निमित्ताने शहरातून ये-जा करता येतील, असे बारा रस्ते पहिल्यांदाच पोलिसांच्या "रेकॉर्ड'वर आले आहेत.

पाच मिनिटात नाकाबंदीचा प्रस्ताव म्हणजेए पोलिस विभागाला नवचैतन्य येण्याचा प्रकार आहे. या प्रस्तावामुळे गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल. अन्‌ पर्यायाने गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होईल.

Friday, July 04, 2008

स्वस्त घरांचे स्वप्न

विकासाचा मार्ग हा कोणाच्या तरी शेतातून, झोपडीतून जात असतो. या मार्गावरून वाटचाल करणाऱ्यांना संबंधित शेतकरी किंवा झोपडीधारकाची साथ मिळाली; त्याला त्या प्रक्रियेत सामावून घेतले, तरच प्रवास सुखाचा होतो; अन्यथा प्रत्येकाच्याच जगण्याचे प्रश्‍नच निर्माण होतात.

सामान्य माणसाने घर घेण्याचा विचार करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे महाकठीण आहे. महागड्या शहरांमध्ये पुण्याची गणना होते. शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन या उद्योगांच्या भरभराटीने शहर आणि उपनगरातील घरांची मागणी गेल्या दहा वर्षांत वाढली. घरांच्या भावात कृत्रिम तेजीही आली. त्याचा फायदा विकसक, दलालांना झाला. गेल्या वर्षभरात महागाईच्या राक्षसाने सामान्यांना भंडावून सोडल्याने, त्याचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला. कृत्रिम तेजीचा बुडबुडा फुटू लागला आहे.

सामान्यांच्या आवाक्‍यात घर येण्यासाठी मात्र विकसकांनी आणि राजकीय नेतृत्वानेच पुढाकार घ्यायला हवा. पोलाद आणि सिमेंटचे भाव पाहता, अडीच एफएसआय दिल्यावर तरी किफायतशीर घरे बांधून देण्याचे बंधन विकसकावर घालावे लागेल. स्थानिक राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप थांबणार काय, "झोपडीधारकांना चारशे चौरस फुटांच्या सदनिका देऊ' हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन. याचे स्पष्टीकरण मिळmयला हवे.

परदेशात अभ्यासदौरे कितीही केले, तरी व्यवस्थेत शिरलेल्या अपप्रवृत्तींचा नायनाट केल्याखेरीज चाकरमान्यांना स्वस्तात घर, हे स्वप्नच राहील.

Wednesday, June 25, 2008

संमेलन सॅन फ्रान्सिस्कोत होणारच - कौतिकराव ठाले- पाटील

एक संमेलन परदेशात घेतले तर काही आकाश कोसळणार नाही. गाडीने रुळ बदलले, की खडखडाट होणारच. अपघात होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. राहिला प्रश्‍न प्रकाशकांचा. संमेलनात पुस्तक विक्री करून नफा कमाविणारे प्रकाशक एक टक्का नफा तरी महामंडळाला देतात का? संमेलनाने आम्हाला द्यावे; पण आम्ही त्यांना देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. संमेलने झालीच नसती, तर त्यांनी काय केले असते? असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी सांगितले.

कौतिकराव ठाले- पाटलांची ही भूमिका योग्य आहे का?

Wednesday, June 18, 2008

राडारोडा जिवावर बेतला

विजेच्या धक्‍क्‍याने दोघे जखमी
शहराच्या विविध भागांत टाकण्यात येणारा राडारोडा आता नागरिकांच्या जिवावर उठला आहे. भैरोबानाल्याजवळील नवीन मुठा कालव्याजवळील राडारोड्याचे डोंगर उच्चदाबाच्या वीजवाहिनीपर्यंत पोचले आहेत. येथून जाताना गेल्या दोन दिवसांत एका मुलासह दोन जण विजेच्या धक्‍क्‍याने भाजून गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी यापूर्वी अनेक जनावरे विजेच्या धक्‍क्‍याने मृत्युमुखी पडली आहेत. या घटनांमुळे या परिसरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमटा वस्तीजवळील या कालव्याच्या परिसरात गेल्या काही वर्षांपासून राडारोडा टाकण्यात येत आहे. येथील नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे आता येथे सुमारे एक किलोमीटरच्या परिसरात राडारोड्याचे डोंगर उभे राहिले आहेत. काही कंपन्यांचा टाकाऊ मालही येथे टाकण्यात येतो. हा राडारोडा आता येथील 22 किलोवॉटच्या उच्च वीजवाहिनीपर्यंत पोचला आहे.

रहदारीच्या असलेल्या या रस्त्यावरून जाण्याचा नागरिकांनी धसका घेतला आहे. या ठिकाणी असणाऱ्या शंकराच्या मंदिराच्या दर्शनासाठी अनेक नागरिक येतात. तसेच वस्तीतील मुले खेळण्यासाठी येथे येतात. त्यामुळे येथील धोका अजूनही कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे टाकण्यात येणाऱ्या राडारोड्याच्या तक्रारीची महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्यानेच हा प्रकार घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. "महापालिका व पाटबंधारे या पुढेही गप्प बसणार की जीव जाण्याची वाट पाहणार,' असा सवाल येथील नागरिकांनी "सकाळ' प्रतिनिधीशी बोलताना केला.

आपल्या घराजवळच्या परिसरात अशाप्रकारचा राडारोडा टाकला जात असेल, तर आम्हाला या ब्लॉगवर जरूर कळवा...अथवा छायाचित्र पाठवा...आपण प्रशासनाकडे तक्रार केली असेल, पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असेल, तर तेही कळवा..

Thursday, June 12, 2008

राडारोड्यामुळे तळेच "गायब'!

मुळा रस्ता ः पावसाळ्यात पाणी झोपडपट्टीत शिरण्याचा धोका

पुणे-मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे सुरू असलेल्या एका मोठ्या बांधकामाच्या जागेतील राडारोडा टाकून मुळा रस्त्यावरील पाण्याचे नैसर्गिक तळे पूर्णपणे बुजविण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात तेथे साचणारे पाणी आता थेट मुळा रस्ता झोपडपट्टीत शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. राडारोड्यामुळे तळे पूर्णपणे गायब झाल्याचे महापालिका प्रशासनाने आता कबूल केले आहे. संबंधित कंत्राटदाराने परवानगी घेतली होती का? परवानगी घेतली असेल तर कोणाची? याशिवाय, परवानगी न घेताच राडारोडा टाकला का, हे प्रश्न पुढे आले आहेत.

मुळा रस्त्यावरील झोपडपट्टीमागे हे विस्तीर्ण तळे आहे. पावसाळ्यात ते पूर्णपणे भरते. तळे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आहे. हे तळे उतारावर असून, उताराच्या खालच्या बाजूस मुळा रस्त्यावरील मोठी झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी महापालिकेच्या हद्दीत आहे. तळ्यामुळे झोपडपट्टीत पाणी शिरण्यापासून रक्षण होत होते. आता तळे पूर्ण बुजविल्यामुळे पाण्याचे लोंढे थेट झोपड्यांना धडकण्याची शक्‍यता आहे.

कारवाई कुणी करायची?
या राड्यारोड्यामुळे पाणी झोपडपट्टीत शिरू शकेल या धोक्‍याची जाणीव आता महापालिका प्रशासन व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही झाली आहे. राडारोडा टाकताना काहीही कारवाई न करणाऱ्या या दोन्ही यंत्रणांमध्ये, राडारोडा काढून संबंधितांवर कारवाई करायची कोणी, यावरून टोलवाटोलवी सुरू आहे.

आपल्याही परिसरात असा राडारोडा टाकलेला असल्यास किंवा टाकला जात असल्यास त्याची माहिती आणि छायाचित्रे या ब्लॉगवर नक्की टाकावीत...

Friday, June 06, 2008

आला पावसाळा...रस्त्यांवर राडरोड्यांचा मारा

गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने पुणेकरांना आणि मुंबईकरांना एक झलक दाखविला आहे. या पावसातच मुंबईच्या रस्त्यांची दूरवस्था समोर आलीय. तर पुण्यात अद्याप रस्त्याची कामेच पूण न झाल्यानं, पुणेकरांची दानादान उडाली आहे. खोदून ठेवलेले रस्ते आणि खड्डे बुजवण्यात महापालिकेला आलेल्या अपयशाचा फटका शहरवासियांना बसलाय. तरीही कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणा हवा तेवढा वेग घेत नसल्याचं चित्र आहे. नदीपात्रांची स्थिती, नाल्यांची स्वच्छता याबाबत तर कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. मागील वर्ष रस्त्याच्या खड्ड्यांनी गाजवलं. आता पहायचंय, हे वर्ष कोण गाजवतंय ते...! आपली मते यावर नक्की कळवा

Thursday, January 10, 2008

तुम्ही गेलाय या कटकटीतून...?

i am born and brought up in pune.i am regular reader of sakal. so i am finally coming to sakal for help. after trying all possible ways of registering my mobile and residence phone number i am not yet satisfied. like many others , i am disturbed by the unwanted phone calls on mobile from various telemarkaters throughout the day. thanks to some hope of national do not call registry.
i registerd on all possible websites and banks sites individually.

still i am getting calls and someone told me that its not yet applicable in pune. please help me out , i dont know where to complain. may be you people could enlighten this issue and find a solution. i am a proffesional doctor and am really getting disturbed by these bank/creditcard/ insurence/mobile co.etc calls.

i will be thankful to you if you could open up this issue.
dr shashank behere, pune


डॉ. सशांक बेहेरे यांचा अनुभव अतिशय बोलका आहे. आपल्याला कसा वाटतो हा अनुभव? कधीतरी तुम्हालाही या कटकटीतून जावे लागलेच असेल ना.? काय केले तुम्ही त्यावेळी, ते आम्हालाही लिहा या ब्लॉगवर....!

Tuesday, January 01, 2008

साथ हवी समाजाचीच!

आधुनिक युगात समस्या अनेक आहेत. गुन्हेगारी, रस्ते, वाहतूक, सार्वजनिक शिस्त, स्वच्छता, राहण्याची सोय...या सगळ्यांवर एकच एक उपाय सध्या तरी नाही. प्रशासनालाही सगळीकडे नियम/कायदे लावणे शक्‍य नाही. त्यासाठी हवी आहे समाजाची साथ. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनीच काही गोष्टी साध्य होऊ शकतील.
- गंगाधर मेढेकर


दर वर्षी जानेवारी येतो. आनंदाने, उत्साहाने आपण नव्या वर्षाचे स्वागत करतो. येणाऱ्या वर्षासाठी नवीन संकल्प करतो. तो नेटाने पूर्ण करण्याचाही संकल्प करतो. शेवटी डिसेंबर उजाडतो. गेल्या वर्षात आपण काय केले, याचे आपण सिंहावलोकन करतो. केलेले नियम, संकल्प सुरवातीच्या १-२ महिन्यांतच विसरले जातात. मग परत जानेवारीत जुन्या संकल्पांबरोबर अजून काही नवीन करायचे ठरवितो आणि शेवटी तेही पूर्णत्वास जात नाहीत... असो!

प्रथम या नवीन वर्षाचे २००८ चे स्वागत करू या. मला वाटते, या वर्षी आपण सारे वैयक्तिक बाबीसाठी, संकल्प न करता माझ्या पुण्यासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या भारतासाठी, काही नवीन गोष्टी, प्रयोग करता येतात का, हे पाहू. त्यासाठी संकल्प करू. अशा कितीतरी गोष्टी आहेत, की जर आपण मोठ्या गटाने एकत्र आलो, तर खूपच विधायक गोष्टी आपण करू शकू. आपण जर समाजासाठी काही गोष्टी करायचे ठरविले, तर त्यात आपण निश्‍चितपणे यशस्वी होऊ, याची मला खात्री आहे. मी समाजाचा एक घटक आहे, मला समाजासाठी दिवसातून एक ठराविक वेळ दिली पाहिजे. यासाठी थोडी आर्थिक झळ सोसावी लागली तरी देईन, ही शपथ स्वतःशीच घ्यायची आहे.

सध्या पुण्यात रहदारी खूप वाढली आहे. ती बेशिस्तीत असल्याने अपघातांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अपघात घडतो. जखमी व्यक्तींना तातडीने रक्ताची आवश्‍यकता असते. त्याला ठराविक रक्तगटाचे रक्त हवे असते. तो गट कुठे मिळेल, हा प्रश्‍न पडतो. जर एखाद्या मोठ्या गटाने, संस्थेने पुढाकार घेऊन रक्तगट सूची तयार केली, तर अपघाती व्यक्तीस तातडीने त्याच्या गटाचे रक्त उपलब्ध होऊ शकेल.

ही सूची पुढील रकान्यात असावी -
व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, फोन/ मोबाईल क्रमांक, रक्तगट, पूर्वी कधी दिले होते, आतापर्यंत किती वेळा दिले, रोग आहे काय? याची माहिती असावी. या सूची, दूरध्वनी सूचीप्रमाणे प्रत्येक दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये, मोठ्या महासंघाकडे असाव्यात, म्हणजे तातडीने व मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होऊ शकेल. यामुळे कदाचित अपघाती वा रुग्णाचे प्राण वाचतील. हे काम मोठे जिकिरीचे आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. तसेच ते खर्चिकही आहे. पण एखाद्या मोठ्या गटाने हे काम हाती घेतले, तर समाजाला निश्‍चितच त्याचा उपयोग होईल. वाटल्यास या सूची काही ठराविक किंमत घेऊन त्याची उपरोक्त ठिकाणी विक्री व्हावी.


मध्यंतरी मी एक प्रयत्न केला व त्यास यशही आले. औंध डी. पी. रोडवरील डॉ. हेमंत दामले यांना आठवड्यातून एक दिवस मोफत चिकित्सा केंद्र ठेवावे, अशी विनंती केली. ती त्यांनी तत्काळ मान्य केली व अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे केंद्र स्थापन झाले. त्यापुढे जाऊन मी त्यांना विनंती केली, की तुमच्या डॉक्‍टर मित्रांना सांगून चिकित्सेनंतरची तपासणी व इतर बाबी अल्पशा मोबदल्यात कराव्यात. मला आनंद वाटतो, आज या दोन्हीही बाबी चालू आहेत. पुण्यात कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून एक संस्था आहे. सर्जन लेफ. कर्नल डॉ. सौ. वीणा खांडेकर या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. त्या व त्यांचे डॉक्‍टर सहकारी व इतर जसे मेजर जनरल विवेक टिळक, डॉ. परिमल लवाटे, सौ. अरुणा जाधव, श्री. केशु मनसुखानी, सौ. मनसुखानी, डॉ. पुसाळकर, कमांडर आनंद खांडेकर ही मंडळी महिन्यातील एका रविवारी पुण्याजवळच्या खेड्यात जाऊन मोफत वैद्यकीय सेवा देतात. हे कार्यही फार मोलाचे आहे. हाच कित्ता इतर काही अशा सेवाभावी संघटनांनी केला, तर किती बरे होईल!


देशांत नेत्रहीनांची संख्याही फार आहे. आपण जगातल्या कित्येक सुंदर गोष्टी पाहू शकतो, त्याचा आनंद घेतो. पण ज्यांना दिसत नाही, पाहता येत नाही त्यांचे काय? मुळात "नेत्रदान' हा शब्दच मला मान्य नाही. आपल्या मृत्यूनंतर आपल्या चांगल्या असलेल्या डोळ्यांचा उपयोग नाही. हेच दोन्ही डोळे इतरांना दिले, अर्थात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली, तर कित्येक लोक आपल्या माता-पित्यास, प्रिय पत्नीस, मुलाबाळांस, या देशातील सौंदर्यपूर्ण वास्तू व इतर बाबी पाहू शकतील. नेत्रदान न म्हणता ते सक्तीचे करावे. त्याशिवाय मृत व्यक्तीच्या शवाबाबत पुढील गोष्टी करण्यास बंदी घालावी ः हीच बाब मूत्रपिंड व इतर अवयवांबद्दल करता येईल. आज पुण्याची लोकसंख्या भयंकर वेगाने वाढत आहे. त्यामुळे नवीन सदनिका तयार होऊनसुद्धा लोकांची गरज भागत नाही. पुण्यात "आयटी'मुळे परप्रांतीयही येथे येत आहेत. याचाच परिणाम म्हणून घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. स्वतःचे घर हे मध्यमवर्गीयांचे स्वप्नच झाले आहे. प्रत्येक पेठेत अनेक गृहरचना संस्था आहेत, त्या रजिस्टर सोसायटी म्हणून नोंदविल्या गेल्या आहेत. या सोसायट्यांचे चेअरमन, चिटणीस, खजिनदार आहेत व ते त्या सोसायट्यांचे काम पाहतात, असे असूनसुद्धा शासन, महापालिकांकडील त्यांची कामे होत नाहीत. काहीतरी कारणे सांगून ती कामे टाळली जातात अथवा पैसे मोजल्यावर होतात. येथे मला असे वाटते, की जर एखाद्या पेठेतील सर्व सोसायट्यांचा मिळून एक महासंघ स्थापन झाला. त्यास शासनाकडून योग्य ती मान्यता घेऊन या महासंघातील पदाधिकाऱ्यास काही अधिकार मिळाले, तर पैसे न देता साऱ्या सोसायट्यांची कामे हा महासंघ व्यवस्थित करू शकेल. यासाठी प्रत्येक सोसायटीस थोडी आर्थिक झळ सोसावी लागेल. या महासंघात स्त्रियांनाही स्थान द्यावे. त्या नेटाने ही कामे करतील. सोसायटीतील घरे जर परप्रांतीय, विदेशीय यांना दिली, तर त्यांचे पूर्ण वर्णन छायाचित्रासह महासंघास, शासनास, पोलिस यंत्रणेस द्यावे. थोडा वचक निश्‍चितच बसेल.


रोजचा पेपर उघडला की खून, मारामाऱ्या, बलात्कार, ज्येष्ठांना लुटल्याचे प्रकार या बातम्या असतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात आहे. मला वाटते, या मागचे मूळ कारण बेरोजगारी आहे. चोरी करणारे हे चोर सराईत चोर नसतात, त्यामुळे त्यांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असणे शक्‍य नसते. घरातील हाल पाहून, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न या समस्या त्यांना भेडसावत असतात. एक प्रयत्न म्हणून ते चोरी करतात. सापडलो तर शिक्षा आहेच; पण नाही सापडलो तर २५/३० हजारांचा ऐवज मिळतो. त्यावर ४/५ महिने काढले जातील ही भावना. त्यावर उपाय म्हणजे खून, मारामाऱ्या, बलात्कार यासाठी मोठी शिक्षा असावी. ज्येष्ठ स्त्री/ पुरुषांस लुबाडले तर पैसे अथवा दागिने सहज हस्तगत करता येतात व त्यांच्याकडून प्रतिकारही फारसा होत नाही.


रस्त्यावर गुन्हे घडताना बघी मंडळी बरीच असतात. विरोध करावा, असे त्यांनाही वाटते. पण एक तर गुन्हेगाराजवळ शस्त्रे असतात. त्याचा वापर त्याने आपल्यावर केला तर? याशिवाय सध्या याच्या फंदात कशाला पडा? पोलिस गुन्हेगारापेक्षा आपल्यालाच हैराण करतील ही भावना. पोलिस खात्यानेही याचा विचार करून अशा लोकांना संरक्षण द्यावे.


येथे असे सुचवावेसे वाटते, की पुण्याचा गणेशोत्सव हा सर्व भारतात मोठा आहे. हा उत्सव पुण्यातील २००/ ३०० मंडळे अहोरात्र परिश्रम करून यशस्वी करतात. कार्यकर्ते, इतर लोक यांच्याकडे कठोर परिश्रम करण्याची क्षमता असते. या मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यांना त्या भागात मानाचे स्थान असते. आपल्या येथे भुरटे चोर कोण आहेत, याची त्यांना कल्पना असते. ही सारी २००/ ३०० मंडळे कळत वा नकळत, एका मोठ्या मंडळास मानणारी असतात. भुरट्या चोऱ्यांच्या बाबतीत मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक स्त्री/ पुरुष पोलिसांनी या मंडळांशी सहकार्य मागितले, तर ते मिळेल असे वाटते. निदान ज्येष्ठांवरील अत्याचारास थोडा तरी आळा बसेल.


शहराच्या लोकसंख्येच्या मानाने पोलिसांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिस पोचतील ही अपेक्षा करणेही योग्य नाही. त्यासाठी पोलिस दलातील निवृत्त झालेले उच्च अधिकारी, न्याय खात्यातील अधिकारी, या दोन्ही खात्यांतील प्रामाणिक नोकर, यांना अधिकार व अल्प मानध? देऊन त्यांचे सहकार्य घ्यावे व यातून मार्ग काढावा असे वाटते. पुण्यात सेवानिवृत्त/ज्येष्ठ नागरिक संघ बरेच आहेत आणि अशी विधायक कामे करतही असतात. सेवानिवृत्त शिक्षक संघटना आहेत. अशा सर्वांनी या सामाजिक कार्यास मदत केली तर पुष्कळ चांगल्या गोष्टी होण्यासारख्या आहेत. "दैनिक सकाळ'ने अशा गोष्टींकडे लोकांचे लक्ष वेधले आहे.


मी या देशाचा नागरिक आहे, देशाचे हित मला जपलेच पाहिजे. माझा देश सुरक्षित तरच मी सुरक्षित. मी यासाठी सामाजिक सैनिक म्हणून काम करण्यास तयार आहे. ही शपथ प्रत्येकाने घेण्याची वेळ आली आहे. निरनिराळ्या ठिकाणी एकत्र या, विचारांची देवाण-घेवाण करा, यश निश्‍चित आहे.

काय करता येईल?
- "मी समाजाचा एक घटक आहे, मला समाजासाठी दिवसातून एक ठराविक वेळ दिली पाहिजे. यासाठी थोडी आर्थिक झळ सोसावी लागली तरी देईन,' ही शपथ स्वतःशीच घ्यायची आहे.
- अपघातातील जखमींच्या मदतीसाठी रक्तगट सूची तयार करणे
- मृत्यूनंतर आपले डोळे दुसऱ्याला देण्याचा आग्रहपूर्वक प्रयत्न
- एका भागातील हाउसिंग सोसायट्यांचा महासंघ स्थापण्यास प्रोत्साहन
- गुन्हेगारी रोखण्यासाठी निवृत्त पोलिसांची, सामाजिक संस्थांची मदत
- गुन्हेगारीविरोधात लढणाऱ्यांना संरक्षण, प्रोत्साहन

Monday, September 18, 2006

Pune Traffic Signal

Whom to blame for this?
Administration?
Or Traffic Police?
Or We The People?