"तारें जमीं पर' नावाचा अत्यंत हृदयस्पर्शी चित्रपट अलीकडेच पाहण्यात आला. त्यातल्या लहानग्या "ईशान'ची समस्या असते "अध्ययन अक्षमता'! या समस्येमुळे ईशानची शिक्षणातील अधोगती, त्यामुळे वैतागलेले, कंटाळलेले पालक; ईशानची समस्या लक्षात न घेताच, त्याला आळशी, बेजबाबदार, वेंधळा ठरवून, शिक्षा म्हणून बोर्डिंग स्कूलला पाठवतात आणि ईशानचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच कोमेजून जाते.
ही हेलावणारी कहाणी आणि ईशानची व्यथा आपल्या वास्तविक आयुष्यात दुर्मिळ मुळीच राहिलेली नाही. विविध शैक्षणिक आणि मानसिक समस्यांनी ग्रासलेले अनेक ईशान आहेत, ज्यांना "सुधारायला' पालक आम्हा डॉक्टरांकडे वा समुपदेशकांकडे आणतात. दुर्दैवाने या सगळ्याच "ईशान'ना सिनेमातल्या आमीर खानप्रमाणे समजून घेणारा, प्रेमाने परत फुलविणारा प्रेमळ शिक्षक मात्र लाभत नाही. चित्रपटासारखा सुखान्त शेवट प्रत्येक ईशानसाठी असावा म्हणून लेख लिहिण्याचा हा खटाटोप.
आजकालच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात पालकांचा मुलांच्या बाबतीतला दृष्टिकोनही खूपच "व्यावसायिक' झालेला दिसून येतो. मुलांना खाऊ, कपडेलत्ते देणे, त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे(!) वागायला शिकवणे (म्हणजेच म्हणे संस्कार!) आणि त्यांना भरपूर गुण मिळतील यावर लक्ष ठेवणे, म्हणजे झाले पालकत्व! अगदी सहज पालक आम्हाला सांगतात, ""अहो डॉक्टर, आम्ही त्याला पाहिजे ते आणून देतो, तो म्हणेल त्या इच्छा पूर्ण करतो, मग निदान त्याने आमच्यासाठी भरपूर मार्क नको का मिळवायला?
''मुलांच्या काही मानसिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. मुलांचा व्यक्तिमत्त्वविकास व्हायला हवा, त्याला एक सुसंस्कारित, मनाने संतुलित, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि जबाबदार व्यक्ती बनवणे हे आपल्या पालकत्वाचे अंतिम ध्येय आहे, याचा पालकांना कुठेतरी विसर पडला आहे.
पालक सतत मुलांच्या अभ्यासाच्या मागे लागलेले दिसतात. शेजारच्या बंड्याला स्कॉलरशिप मिळाली म्हणून आपल्याही मुलाला मिळावी, या पद्धतीने प्रत्येक मुलातले सगळे फक्त चांगले नव्हे, तर उत्कृष्ट गुणच आपल्या पाल्यात असावेत, असा पालकांचा आग्रह असतो. अभ्यासच नव्हे तर "ट्यूशन', "ऍबॅकस'चा क्लास, नृत्य, संगीत, चित्रकला अशा विविध क्लासमध्ये मुलाने प्रावीण्य दाखवायलाच पाहिजे, असा हट्ट ते धरतात; पण कुठलेही मूल सर्वगुणसंपन्न अभावानेच असते. त्यामुळे आपले मूल आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्तुंग यश मिळवत नाही म्हटल्यावर मनात येणारा राग, निराशा, वैताग सगळा मुलावरच चिडून व्यक्त केला जातो. मुलांना रागात बेदम मारणे, उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे, चटके देणे आणि "होस्टेलला ठेवू'पासून "घरकाम करायला लावू'पर्यंतच्या विविध धमक्या या शिक्षा सुशिक्षित घरांतूनही ऐकायला मिळतात.
ही कथा आहे नॉर्मल मुलांची. मग ज्यांना अतिचंचलता, अध्ययन अक्षमता, ऑटिझम, गतिमंदत्व अशा बौद्धिक किंवा मानसिक समस्या असतील अशांचे हाल तर ऐकवत नाहीत. शिक्षक, पालक सर्वांकडून त्यांची हेटाळणी आणि उपेक्षा होते. त्यांचे सगळे आयुष्य शिक्षा, तिरस्कार, टोमणे, अवहेलना यांनी भरून जाते.
यात सर्वांत दुर्दैवी गोष्ट अशी, की भारतात अजून तरी अशा संस्था वा कायदा कार्यरत नाही, ज्याद्वारे अशा समस्या असलेली मुले शोधून पालकांना त्यासाठी योग्य उपाययोजना करणे भाग पाडले जाईल. त्यामुळे पालकांना जेव्हा उपरती होईल, त्यांचे जेव्हा डोळे उघडतील तेव्हाच या मुलांना तज्ज्ञ व्यक्तीकडे नेले जाते आणि त्यावर औषधे वा उपाय केले जातात. दुर्दैवाने आपल्याकडे अशा समस्यांसाठी समुपदेशकाकडे जाणे इतके कमीपणाचे आणि लाजिरवाणी समजले जाते, की आपल्या मुलाला समस्या आहे, हे मान्य करण्याची पालकांचीच मानसिकता नसते. त्यामुळे पालकांना हे पटून ते मूल तज्ज्ञाकडे पोचेपर्यंत समस्या बऱ्याच वेळा दुर्धर आणि गुंतागुंतीची झालेली असते.याकरिता आपल्याकडे नुसत्या पालकांचेच नव्हे, तर शिक्षकांचेही प्रबोधन करण्याची गरज आहे.
विविध शैक्षणिक व मानसिक समस्यांची माहिती आपल्याला असेल, तर आपण आपल्या मुलांवर लवकरात लवकर योग्य उपचार करू शकू. मुलांना क्रूरपणे शिक्षा करणाऱ्या, त्यांच्यावर मानसिक अत्याचार करणाऱ्या पालकांविरुद्ध मुलांना संरक्षण देणारे कायदे असणे, त्याची जनसामान्यांना माहिती असणे आणि त्याची अंमलबजावणी होणे खूप गरजेचे आहे. शिक्षण खात्याने अशा मुलांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्याचीही माहिती सर्व पालकांना असणे; किंबहुना आपल्या शिक्षणपद्धतीत समस्याग्रस्त मुलांचा वेगळ्या सकारात्मक दृष्टीने विचार होणे ही काळाची गरज बनली आहे.
सगळ्याच मुलांनी "शंभरपैकी शंभर मार्क' मिळवावेत हा हट्ट न धरता प्रत्येक मुलाची क्षमता, त्याच्यातली वेगळी कौशल्ये जोपासून त्यांना फुलवले गेले, तर "Every child is special' हे आपण प्रत्यक्ष अनुभवू शकू.
- डॉ. मीनल सोहनी(लेखक होमिओपॅथिक तज्ज्ञ व समुपदेशक आहेत.)