Showing posts with label narayan rane. Show all posts
Showing posts with label narayan rane. Show all posts

Saturday, December 13, 2008

नारायण राणेंनी स्वगृही परतावे - समर्थकांचा कल

नारायण राणे यांनी आपली आगामी राजकीय वाटचाल नागपूर अधिवेशनानंतर घोषित करण्याचे स्पष्ट केले आहे; परंतु त्यांनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असा विचार त्यांच्या समर्थकांतून व्यक्त होऊ लागला आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत कॉंग्रेसमधील घुसमटीतून मोकळे झालेले कार्यकर्ते आणि समर्थक नव्या पक्षासाठी फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे राणेंच्या आगामी भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राणेंवर कॉंग्रेसने केवळ निलंबनाचा बडगा उगारला आहे. कॉंग्रेसमधून निलंबनाचा कालावधी ठरविलेला नाही. राणेंनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा दिलेला नाही; परंतु पक्षश्रेष्ठींसह ते सत्ताधाऱ्यांवर आरोप करीत आहेत. कॉंग्रेसमधील आपणास एकही पद नको. हा पक्ष केवळ दलालांचा आहे. तेथे प्रामाणिक माणूस चालत नाही. पक्ष संपविणाऱ्या माणसांना तेथे मान-सन्मान नाही, अशी टीका राणेंनी केली आहे. त्यामुळे राणे आता कॉंग्रेसमध्ये फार काळ थांबणार नाहीत, या शक्‍यतेला बळकटी मिळत आहे. अधिवेशनानंतर आपली भूमिका जाहीर करताना ते कॉंग्रेसला स्वतःहून सोडचिठ्ठी देतील, असे चित्र कालच्या सभेनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे राणे आपली राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने ठेवतील, या बाबत उत्सुकता आहे. काल येथे झालेल्या मेळाव्यानंतर जवळच्या समर्थकांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत राणेंनी प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेतले. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांनुसार पूर्ववैमनस्य विसरून शिवसेनेत परतावे. कॉंग्रेसने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा असल्यास स्वगृही परतणे हितकारक ठरेल, असा सूर कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. काही कार्यकर्त्यांनी मात्र नवा पक्ष काढून आपली ताकद आजमावायला काय हरकत आहे, असे मत मांडल्याचे समजते.

आपल्यालाही राणेंनी स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतावे, असेच वाटते का? की त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून आपले सामर्थ्य दाखवून द्यावे...

Tuesday, August 19, 2008

राणे कॉंग्रेस सोडणार?

कॉंग्रेसमध्ये एकाकी पडलेले महसूलमंत्री नारायण राणे आता पक्षातूनही बाहेर पडणार का, अशी चर्चा सध्या सुरू असून, "आता राणे फार काळ पक्षात राहत नाहीत,' अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांतच याबाबतची हालचाल अपेक्षित असल्याचा अंदाज पक्षात व्यक्त होत आहे.

पक्षश्रेष्ठींनी देऊ केलेल्या "शेवटच्या संधी'वरही राणे यांच्याकडून प्रतिसाद न आल्याने आता ते कॉंग्रेसचे कमी दिवसांचेच सोबती राहिल्याचेही बोलले जात आहे. राणे यांना पक्षात सामावून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरूनही अनेक प्रयत्न करण्यात आले होते. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांना देऊ करण्यात आले होते; पण त्यांनीच ते नाकारले होते. त्यानंतरच त्यांना प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्षपद देऊ करण्यात आले आणि त्याबाबतही त्यांनी फारशी अनुकूलता दाखविली नाही. राणे यांनी त्यांचा हट्टीपणा सोडावा, यासाठी कॉंग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल, महाराष्ट्राच्या प्रभारी सरचिटणीस मार्गारेट अल्वा, राणे यांना कॉंग्रेसमध्ये आणण्यात मोठी भूमिका बजावणारे बाळासाहेब विखे-पाटील यांनीही त्यांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले. अगदी राणे यांनी दिल्लीस दिलेल्या शेवटच्या भेटीच्या वेळीही त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता; पण राणे यांनी भूमिकेत बदल केला नाही.

आता राणे पक्षात व सरकारमध्येही एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांच्या पुढील हालचालींचा अंदाज घेतला जात आहे; परंतु राणे आता फार काळ पक्षात राहणार नाहीत, असेच त्यांच्याबद्दल ठामपणे बोलले जात आहे. राणे कदाचित आपला एखादा वेगळा पक्ष काढतील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. "ते' भाकीत खरे ठरणार?

Friday, August 08, 2008

प्रश्‍न भूमिकेचा...!

नारायण राणे यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे, व्हिडिओकॉनला एवढ्या कमी दरात जमीन देण्याचा अट्टाहास विलासराव का करत आहेत? आज राणे यांनी आवाज उठविला म्हणून, राज्य सरकारचे बिंग फुटले अन्यथा ही गोष्ट सर्वसामान्यांपर्यंत आलीही नसती, अशा प्रतिक्रियांबरोबरच नारायण राणे सतत प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात, व्हिडिओकॉलला विरोध करणे म्हणजे..ही सर्वसामान्यांच्या प्रती कळकळ नाही, तर स्वत:ची जनतेसमोरची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा त्याचा हा व्यर्थ प्रयत्न आहे. ते किती भ्रष्टाचारी आहेत, हे अख्ख देश जाणतो. त्यांना या जमीन व्यवहारात सहभागी करून घेतले असते, तर तेरी भी चूप मेरी भी चूप असे चित्र निर्माण झाले असते, अशी मतेही "ई- सकाळ'च्या वाचकांनी सकाळ ब्लॉगवर नोंदविली.

नवी मुंबईतील सिडकोची 250 एकर जमीन व्हिडीओकॉन उद्योग समूहाला केवळ 910 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय विलासराव देशमुख यांच्या मत्रिमंडळाने घेतला. त्यास नारायण राणे तीव्र विरोध करतानाच राजीनाम देण्याचा इशाराही दिला. त्यावर संताप व्यक्त करताना देशमुखांनी राज्यात उद्योग यायला हवे की नकोत, असा खडा सवालही केला. त्या पार्श्‍वभूमीवर आम्ही "ई- सकाळ'च्या वाचकांना मते नोंदविण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत, अनेक वाचकांनी थेट प्रतिक्रिया नोंदविल्या.

जर्मनीत स्थायिक असलेले संतोष म्हस्के म्हणाले, ""राजकारणी म्हणून नारायण राणे आवडतात की नाही, हा मुद्दा नाही. तर, त्यांनी सध्या जी भूमिका घेतली ती अत्यंत महत्त्वाची आहे. मला खात्री आहे, की मध्यमवर्ग राणे यांच्या भूमिकेचे स्वागत करतील. सिडकोच्या या जागेवर घरकुलांची योजना राबविल्यास त्यामुळे मध्यमर्गीयांची निश्‍चितच सोय होणार आहे. देशमुख आणि जयंत पाटील यांनी जमिनीचा व्यवहार कोणत्या आधारे केला, हा प्रश्‍नच आहे.

'' कॅप्सतुभ याबाबत म्हणाले, ""इंद्रायणी नदीच्या कार्ल्याच्या पात्रात 30 हजार ट्रक राडारोडा टाकून त्यावर रिसॉर्ट बांधणाऱ्या बिल्डर्सना राणे यांनीच अभय दिले आहे. तसेच इतर कित्येक गोष्टीत पैसा खाण्यात त्यांचा वाटा आहे. निवडणूका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपली पोळी भाजून घेतला, सर्वसामान्य खड्ड्यात गेले, तरी चालेल, पण अल्पसंख्यांकाची त्यांना मते हवी आहेत.

''कॅप्स्तूभ यांना दुजोरा देताना शीतल म्हणाल्या, ""आज राणे यांनी आवाज उठविला म्हणून देशमुखांनी केलेला व्यवहार जनतेसमोर आला. खरे तर कोणीच देशासाठी आणि जनतेसाठी काही करत नाही. पण, या व्यवहारातून आपण आपल्या जनतेचे पर्यायाने देशाचे भले करू शकलो, तरी देशाची बरीच प्रगती होईल.''

दीपक लालिंगकर म्हणाले, ""जमीन विकासासाठी टीआयएआर ला आंध्र प्रदेशने त्यांच्याकडील जमीन विनामूल्य दिली आहे. काही व्यवहार वगळले, तर सेझसारख्या अनेक विषयांत ते सक्रीय सहभागी राहिले आहेत, असे मत अशाच एका वाचकाने व्यक्त केले.''

या व्यतिरिक्त आपल्या आणखी काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा.