एकदशांश लोकसंख्येला "सिकलसेल' आजार
राज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी 21 लाख नागरिकांना "सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यातील नागरिकांना "सिकलसेल' (रक्तामधील रोगप्रतिकारक पेशींना नष्ट करणाऱ्या कोयत्याच्या आकाराच्या पेशी तयार होणे) या रोगाने ग्रासले आहे. या आजारात माणसाच्या शरीरातील रोगप्रतिबंधक शक्ती कमी होऊन त्याला अन्य आजार होतात. त्यातच त्याला मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजने तयार केलेल्या अहवालानुसार हा प्रकार उघडकीस आला आहे. या भागातील गरिबी, अशिक्षितपणा आणि कुपोषणामुळे या रोगाचे प्रमाण वाढले आहे. याची व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने एक बैठक बोलावून या आजारावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्यस्तरावरील उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
"सिकलसेल' हा आजार विशेषतः आदिवासींना होतो. हा आजार अनुवंशिक असल्याने त्याची व्याप्ती वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रोगावर प्रभावी औषध आजही उपलब्ध नाही.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते? सिकलसेलने ग्रासलेले रुग्ण दगावल्यानंतर शासनाचे डोळे उघडले नाही, हे नशीबच म्हणायचं...
1 comment:
Govind
This is not new. Life extremely cheap as far as polotians are concerned. They are not bothered for anything.
Post a Comment