Showing posts with label marathi patya. Show all posts
Showing posts with label marathi patya. Show all posts

Friday, September 19, 2008

"पाट्यां'पलीकडील अस्मिता

"मनसे'चे नेते राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्‌द्‌यावरून छेडलेले आंदोलन अमिताभ बच्चन यांच्या माफीनाम्यानंतर मागे घेतले. दरम्यानच्या काळात पुणे- मुंबईतील दुकानदार आणि आस्थापना यांनी आपल्या पाट्यांचे मराठीकरण केले. त्यामुळे किंवा जया बच्चन यांनी मागितलेल्या माफीमुळे "मराठीची अस्मिता' कदाचित जागी होईल; परंतु मराठीचे जतन आणि संवर्धन मात्र होणार नाही. भाषेचे राजकारण करणे तसे सोपे असते.

एकीकडे भाषिक अज्ञान आणि दुसरीकडे भाषिक दुरभिमान यांच्या कोंडीत सापडलेल्यांनी थोडा गांभीर्याने विचार करण्याची म्हणूनच आज गरज वाटते. भाषा हे समाजाच्या विविध घटकांना, वेगवेगळ्या स्तरांना जोडणारे साधन असले पाहिजे. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील समाजाचे संघटन भाषेच्या आधारेच घडत असते. भाषिक संस्कृतीच हे कार्य करीत असते. त्यासाठी समाजजीवनाची व लोकव्यवहाराची जी विविध अंगे आहेत, तेथे कटाक्षाने स्वभाषेचा वापर व्हावयास हवा.

लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे सामाजिक विचार आणि व्यवहार यात मराठीचा आग्रहपूर्वक वापर केला तर मराठी भाषाही टिकेल आणि त्यायोगे मराठीभाषकांची संस्कृतीही! इंग्रजी माध्यमाच्या सर्व स्तरांतून होत असलेला जाणीवपूर्वक स्वीकार हा अपरिहार्य असला तरी त्यामुळे निजभाषेचे महत्त्व कमी होत नाही. शिक्षण, रोजगार, अर्थार्जन, व्यापार, उद्योग या निमित्ताने परप्रांतातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आणि त्यातून मराठी-अमराठीचे वाद अधूनमधून डोके वर काढत राहणार आणि भाषिक संस्कृतींचे संघर्षाचे प्रसंगही निर्माण होणार! तूर्त इंग्रजीच्या आक्रमणापेक्षा मराठीपण टिकविण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

आपल्या काय वाटते? मराठीची अस्तिता टिकविण्यासाठी काय केले पाहिजे. त्यात शासनाने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे.

Thursday, August 28, 2008

मराठी पाट्या लावा

महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.

मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या नाहीत तर परिणामांना सामोरे जा, असा अंतिम इशाराही त्यांनी दिला.गेल्या काही दिवसांपासून मराठी पाट्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच काल मनसेने व्यापाऱ्यांची सभा उधळून लावली होती. या पार्श्‍वभूमीवर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज ठाकरे यांनी चौफेर हल्ला चढविला.

महाराष्ट्राची राजभाषा मराठी असावी, हा १९६१ चा कायदा आहे , तरीही राज्याच्या भाषेसाठी कोर्टात जावे लागते यासारखे दुर्दैव नाही. भाषेसाठी कोर्टात जाणारे कुठलेही राज्य या देशात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कायदा आमच्यामुळे झाला असून, मनसेने त्याचे श्रेय घेऊ नये, असा इशारा दिला. मराठीचा आग्रह योग्य असला, तरी त्यात पक्षीय राजकारण आणणे योग्य आहे का? या सर्वांत तुम्ही कोणती भूमिका घ्याल? आम्हाला येथे नक्की कळवा...