Showing posts with label ST bus. Show all posts
Showing posts with label ST bus. Show all posts

Saturday, May 03, 2008

एस. टी.च्या सुधारणेसाठी...

खासगी स्पर्धेनंतर राज्य परिवहन महामंडळाने अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत, परंतु अजून बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील. महाराष्ट्रामध्ये नव्यानेच विकसित झालेल्या रस्त्यांचे प्रतिबिंब एस. टी.मध्ये पडताना दिसत नाही.

प्रवाशांच्या सुखसोयीसाठी काही नियम केले आहेत, हे अधिकारी विसरून जातात व नियमासाठी प्रवासी आहेत या न्यायाने वागत राहतात. ही मानसिकता बदलली पाहिजेच. तसेच रस्त्यांच्या सुधारणेमुळे जलद प्रवासाची नोंद घेऊन त्या अनुषंगाने जाण्यायेण्याच्या वेळेमध्ये आवश्‍यक ते बदल सर्वच रूटवर करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रवासामध्ये वेळ वाचू शकेल आणि प्रवासाला वेळ कमी लागतो हे प्रवाशांच्या लक्षात येऊ लागले, तर एस.टी.कडे प्रवाशांची गर्दी वाढू शकेल.

एशियाड बस ही संकल्पना कालबाह्य होऊ लागली आहे. सीटवरची कापडी कव्हर्स सोडली तर 3 बाय 2 एशियाडमध्ये आणि साध्या बसमध्ये तसा काहीच फरक नाही. आराम गाड्यासाठी व्होल्वो बसचा वापर करावा. काही वेळेला एकाच रूटवर एकाच शहराकडे पाठोपाठ बस धावत असतात. काही ठिकाणी ते अपरिहार्य आहे. तथापि, प्रत्येक रूटचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यामध्ये बदल करता येऊ शकेल काय याचा विभागवार आढावा घ्यावा.

रेल्वे खात्याने भारतातील सर्व रेल्वे गाड्यांचे "ऍट अ ग्लान्स' असे एकच रेल्वे वेळापत्रक तयार केले आहे. त्या धर्तीवर महामंडळाने महाराष्ट्रातीस एस. टी. बसचे वेळापत्रक तयार करून ते सर्वत्र विक्रीस ठेवण्याची व्यवस्था केल्यास एस.टी.चे प्रवासी निश्‍चितच वाढू शकतील. मोठ्या शहरामधील बस स्टॅंड शहराबाहेर हलविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचबरोबर बाहेरील मार्गावर ठरावीक अंतरावर थांबे निर्माण केले पाहिजेत व तेथून प्रवाशांना शहरामध्ये सुलभपणे जाण्यायेण्यासाठी अहोरात्र बस सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. भाडेवाढ न करता एस. टी. फायद्यात ठेवण्यासाठी काही कठोर निर्णयही घेणे गरजेचे आहे.-

- एम. पी. रायबागकर